कालिदास
इ.सा. पूर्व ४ थे शतक मधे महाकवी कालिदास होऊन गेलेत.
कालिदासाने ‘मालविकाग्नीमित्र’, ‘शाकुंतल’ आणि ‘विक्रमोर्वशीय’ हि तीन नाटके, ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ हि दोन महाकाव्ये, आणि ‘मेघदूत’ हे खंड काव्य तसेच ‘ऋतुसंहार’ हे निसर्गवर्णनपर काव्य रचले आहे.
कालिदास हा जन्माने गवळी. त्यामुळे सुरुवातीला अशिक्षित होता पण दिसायला अत्यंत राजबिंडा अन देखणा होता. तर ह्या गवळ्याच्या पोराचा महाकवी कसा झाला ह्याची आख्यायिका मोठी रंजक आहे.


विक्रमाच्या साम्राज्यात अवंती नावाची नगरी होती. तेथील एका धनाढ्य व्यापाऱ्याची मुलगी अनंगमंजिरी हि रूपाने अत्यंत सुंदर आणि बुद्धीने तल्लख होती. त्यामुळे तिला शिकवायला वररुची ह्या महापंडीताची नेमणूक त्या व्यापाऱ्याने केली होती.
एकदा तारुण्य सुलभ अवखळपणामुळे, लाडावलेली मुलगी असल्याने तिने वाररुचीचा अपमान केला. त्यामुळे संतापून जाऊन वररुचीने तिला शाप दिला की, तु आपल्या गुरुचाच अपमान करते आहेस. तुला आपल्या बुद्धिमत्तेचा आणि पैशाचा बराच अहंकार आहे असे दिसते. तर तुला एक अडाणी, गुराखी माणूसच नवरा म्हणून मिळेल आणि तोच तुझी आणि तुझ्या अहंकाराची रग जिरवेल.
त्यावर अनंगमंजीरीदेखील न डगमगता म्हणाली, “जरी तो गुराखी असला तरी तुमचा गुरूच असेल. “
हा प्रसंग तसा छोटा त्यामुळे त्याची घरात फारशी वाच्यता झाली नाही. वररुची आणि अनंगमंजिरी दोघेही लवकरच हा प्रसंग विसरून गेले.
अनंगमंजिरी थोडी मोठी झाल्यावर तिच्याकरता योग्य वर शोधण्याची विनंती व्यापाऱ्याने वररुचीलाच केली. वररुची हि आनंदाने तयार झाला.
तसाही तो उज्जयनीला विक्रमादित्याकडे चाललाच होता तेथे राजधानीतच एखादा सुयोग्य वर शोधायचे त्याने मनात ठरवले.
तर उज्जयनीला जात असता तो वाटेत उन्हामुळे व भूक तहान ह्यामुळे व्याकूळ झाला. कुठे काही पाणी अन्न मिळते का म्हणून पाहत असताना त्याला माळावर गुरे चारत असलेला हा गुराखी-कालिदास भेटला.
वररुचीने त्याला प्यायला पाणी व अन्न मागितले, पण नेमके त्याच्याकडेही वररुचीला द्यायला काहीच नव्हते आणि असते तरी एक ब्राह्मण गुराख्याच्या हाताचे अन्न पाणी कसे घेणार? पण चलाख गुराखी म्हणाला, “भटजी बुवा मी गुराखी, माझ्या हातचे अन्न पाणी तुम्हाला चालवायाचे नाही पण गाईचे दुध चालेल. ते तर भूलोकीचे अमृत, तर तुम्ही ते गाईची धार काढून प्या.” पण वररुचीला गाईची धार कुठे काढता येत होती! शिवाय त्याच्याकडे दुध जमा करायला भांडेही नव्हते, आता काय करावे ह्या विवंचनेत तो असतानाच कालिदास म्हणाला, ” ओ भटजी बुवा, एवढा काय विचार करता? मी धार काढतो तुम्ही करचांडी करा. “
हा करचांडी काय प्रकार असतो हे काही वररुचीला ठाऊक नव्हते. तेव्हा कालिदासाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला दाबून खाली बसवले आणि करचांडी म्हणजे दोन्ही हाताची ओंजळ करायला लावले.
मग त्या ओंजळीत त्याने गाईच्या आचळातली धार सोडली जी पिऊन वररुची तृप्त झाला.
आता अचानक वररुचीला आपण शिरावर घेतलेली अनंगमंजिरीच्या करता वर शोधायची जबाबदारी आठवली…तसेच काही वर्षापुर्वीची शापाची घटनाही आठवली.
हा तल्लख पण लौकिकार्थाने अडाणी निरक्षर मुलगा गुराखी होताच, पण त्याने वररुची सारख्या भाषाप्रभूला एक नवा शब्द शिकवला होता. शिवाय त्याच्या मस्तकवर हात ठेवून त्याच्या ओंजळीत दुध वाढले होते म्हणजे एका अर्थी तो त्याचा गुरु ही झाला होता.
हा ईश्वरी संकेत मानून त्याने कालिदासाला सर्व हकीकत सांगितली व त्याला आपल्याबरोबर अवंती नगरी येऊन अनंगमंजिरीशी विवाह करण्याची गळ घातली.
कालिदासाने भयंकर घाबरला. कुठे ती सुस्वरूप, धनवान अनंगमंजिरी आणि कुठे आपण! आपला अपमान करुन लोक गावातून हाकलून देतील. गावभर शोभा करतील, म्हणून तो आढे वेढे घेऊ लागला.
पण वररुचीने त्याला अनंग मंजीरीशी विवाह केल्यानंतर उपभोगायला मिळणारे ऐश्वर्य व तिच्या स्वर्गीय सौंदर्याची अशी काही मोहिनी घातली कि शेवटी तो तयार झाला.

तो हुबेहूब एखादा विद्वान ब्राह्मण तरुण दिसेल असे वररुचीने त्याचे बेमालूम वेषांतर केले आणि त्याला सांगितले कि मी सगळे सांभाळून घेईन तू फक्त गंभीर चेहरा ठेवून राहायचे.
काही झाले तरी बोलायचे नाही. फक्त कुणी नमस्कार केला, अभिवादन केले तर फक्त “सुपीडास्तु दिने दिने…” (रोज तुम्हाला गोड गोड पीडा होवोत) असा थोडा वेगळाच आशीर्वाद द्यायचा. तसा आशीर्वाद त्याकडून घोकुनही घेतला.
त्याप्रमाणे ते दोघे अवंती नगरीत आले व वररुचीने आपण अनंगमंजिरी साठी सुयोग्य वर शोधून आणल्याची वार्ता व्यापाऱ्याला सांगितली.
व्यापारी आनंदित होऊन मोठा लवाजमा घेऊन, वाजत गाजत त्याला भेटायला वररुचीकडे आला. पण झाले काय कि व्यापाऱ्याचे ऐश्वर्य आणि थाट माट पाहून बावचळून गेलेल्या कालिदासाच्या तोंडून सुपीडास्तु दिने दिने ह्या आशीर्वादा ऐवजी “त्रीपीडास्तु दिने दिने…” (तुला रोज तीन तीन प्रकारच्या पीडा होवोत) असा चरण निघून गेला.
आता प्रसंग मोठा गंभीर झाला. गाजावाजा करत मानाने ज्याला न्यायला आलो त्या भावी जावयाने असा शाप द्यावा. व्यापारी चिडला पण वररुचीने प्रसंगावधान राखून सांगितले कि वाटते तसा हा शाप नाही. पूर्ण श्लोक असा
प्रदाने विप्र पीडास्तु , शिशु पीडास्तु भोजने |
शयने रति पीडास्तु, त्रिपीडास्तु दिने दिने ||
( दान करताना याचक ब्राह्मणांची पीडा होवो (प्रत्यही इतके दान करता येण्याजोगे ऐश्वर्य व भाग्य लाभो), जेवताना मुलांनी त्रास देवो (भरपूर मुलं असो) व झोपताना पत्नी रोज त्रास देवो म्हणजे रोज उत्तम शरीर भोग भोगायला मिळो अशा तीन प्रकारच्या गोड गोड पीडा तुला रोज रोज होवोत.)
– हा असा अफलातून आशीर्वाद ऐकून व्यापाऱ्याची खात्रीच झाली कि असा वर आपल्या कन्ये करता शोधूनही सापडावयाचा नाही.
त्याने मोठ्या थाटामाटाने कालिदासाचे लग्न आपल्या लाडक्या कन्येशी अनंगमंजिरीशी लावून दिले.

पण लग्नानंतर लवकरच अनंगमंजिरीला आणि व्यापाऱ्याला वस्तुस्थिती कळून आली. आणि अनंगमंजिरीला हेही कळले कि धूर्त वररुचीने दिलेला शाप खरा करून दाखवला, पण आता काय करणार?
हे सगळे बाहेर कळले तर आपली व आपल्या वडलांचीच छी थू होणार म्हणून ती गप्प बसली. पण आपले बिंग बाहेर फुटू नये म्हणून त्यानी कालिदासाला कुठे घराबाहेर जायला, कुणाशीही बोलायला बंदी घातली.
कालिदासाला खूप वाईट वाटले. त्याने ठरवले कि ह्याना आपण मूर्ख निरक्षर आहोत म्हणून आपली लाज वाटते ना, मग आपण आपली आराध्य देवता काली माता (म्हणून तो कालिदास) हिला साकडे घालू, तिला प्रसन्न करून घेऊ आणि तिच्याकडे विद्येचे वरदान मागू.
म्हणून मग तो गावाबाहेरच्या ओसाड पडलेल्या कालीमातेच्या मंदिरात जाऊन तिचे पाय धरून बसला.
त्याने पण केला कि जोपर्यंत देवी त्याला प्रसन्न होत नाही व त्याला विद्येचे वरदान देत नाहे तो पर्यंत तो तेथून हलणार नाही व अन्न पाणीही घेणार नाहे. असेच १५-२० दिवस गेले.
आता अनंगमंजिरीला काळजी वाटू लागली कि देवी तर ह्या मुर्खाला प्रसन्न व्हायची नाही, पण उपासा तपासाने हा मरून आपल्याला वैधव्य मात्र यायचे म्हणून मग तिने आपल्या एका दासीला विश्वासात घेतले व सांगितले कि अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री तिनेच देवीचे सोंग घेऊन जावे व आपण कालिदासाला प्रसन्न झालो आहोत असे सांगून तो म्हणेल तो वर त्याला द्यावा. म्हणजे तो हे खूळ डोक्यातून काढेल.
इकडे देवीने विचार केला हा माझा भक्त मूर्ख अडाणी खरा, पण साधा भोळा आणि एक निष्ठ आहे. त्याला माझे रूप घेऊन कुणी फसवणे म्हणजे माझ्याच प्रतिष्ठेला कमी पणा येणार, त्यापेक्षा मी त्याला प्रसन्न होऊन त्याचे मनोरथ पूर्ण करते. म्हणून दासी यायच्या आधी देवीच त्याला प्रसन्न झाली व वर माग म्हणाली.
कालिदासाने तिच्याकडे विद्या मागितली, सरस्वती त्याला प्रसन्न व्हावी असे मागितले. देवी तथास्तु म्हणून अंतर्धान पावली.

हा सर्व प्रकार त्या दासीने पाहिला व अनंगमंजिरीला जाऊन सांगितला. तेवढ्यात वरदान प्राप्त झालेला कालिदास ही तिथे येऊन पोहोचला. तेव्हा खरेच का ह्याला सरस्वती प्रसन्न झाली आहे हे पाहण्याकरता अनंगमंजिरीने त्याला –
“अस्ति कश्चित वाग्विशेष:”
(बोलण्यासारखे काय विशेष आहे तुझ्याकडे?)
असा प्रश्न विचारला. आता कालीदासाची प्रतिभा व स्वाभिमान दोन्ही जागृत झाले होते. त्याने त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल, त्या प्रश्नातील प्रत्येक शब्दा पासून सुरु होणारी तीन महाकाव्ये तिथेच रचली.
त्यातले पहिले म्हणजे कुमारसंभव सुरु होते अस्ति ह्या शब्दाने.
अस्त्युत्तरस्या दिशी देवतात्मा,
हिमालयो नाम नगाधिराज:|
ह्या चरणाने
तर दुसरे म्हणजे मेघदूत सुरु होते,
कश्चित कांता विरह विगुणा, स्वाधिकारात प्रमत्त:|
ह्या चरणाने
आणि,
वागर्था विव संपृक्तौ, वागार्थ प्रतिपत्तये|
जगत: पितरौ वन्दे पार्वति परमेश्वरौ||
ही सुरुवात आहे रघुवंशाची.

हे पाहून/ ऐकून हा आता साधा अडाणी गुराखी कालिदास न राहता महाकवी कालिदास झाला आहे हे अनंगमंजिरीने ओळखले व त्याचा अपमान केल्याबद्दल क्षमा मागितली.
कालिदासाने ही तिलाच आपल्या ह्या महाकवी होण्यामागचे खरे कारण मानून तिचा स्वीकार केला व तो पुढे राजा विक्रमादित्याच्या पदरी जगद्विख्यात महाकवी कालिदास म्हणून नावारूपाला आला.
